डॉ बाबासाहेबांच्या दृष्टीने धम्म : सामाजिक समतेसाठी नवा पर्याय
DOI:
https://doi.org/10.7492/w7e53r17Abstract
14 एप्रिल 1891रोजी जन्मल्यापासून ते 13 ऑक्टोबर 1956 पर्यंत संपूर्ण आयुष्य हिंदू धर्मात घालवल्यानंतर14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे पूज्य 'भंते महास्थवीर चंद्रमणी' यांच्याकडून माईसाहेब सविता आंबेडकर यांच्या समवेत, हजारो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्याला प्रमुख कारण होते, विषमतेवर आधारित कर्मठ जातीव्यवस्था.
जातीव्यवस्था :
डॉ. बाबासाहेब त्यांच्या 'मूकनायक' या पक्षिकाच्या पहिल्या अंकात भारतातील जातीव्यवस्थेचे वर्णन करताना तिला मनोऱ्याची उपमा देताना लिहितात की " हिंदुस्थान हा देश म्हणजे केवळ विषमतेचे माहेरघर आहे. हिंदू समाज हा एक मनोरा आहे. व त्यातील एकेक जात म्हणजे एक एक मजला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे या मनोऱ्याला शिडी नाही. म्हणजेच एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्यास मार्ग नाही. ज्या मजल्यात जो जन्माला त्याच मजल्यात त्याने मरावे. खालच्या मजल्यातील मनुष्य कितीही लायक असला तरी त्याला वरच्या मजल्यात जाण्यास प्रवेश नाही. तसेच वरच्या मजल्यातील माणूस किती नालायक असला तरी खालच्या मजल्यावर लोटून देण्याची व्यवस्था नाही"¹
जातीव्यवस्थेचा अभ्यास करताना त्यांनी 'भारतातील जाती ' ( कास्ट इन इंडिया )या विषयावर शोध निबंध लिहिला व तो पुस्तक रूपाने प्रसिद्ध केलेला आहे.
जाती व्यवस्था ही माणसाच्या असमानतेवर आधारलेली आहे. माणसाच्या जन्मापासून जातीच्या नावाने त्याच्याशी असमान व्यवहार सुरू होतो. जातिव्यवस्थेने माणसांना चार हजार पेक्षा जास्त संख्येने विभाजित केले आहे. त्यांचे विभाजन हे क्रमिक असमानतेवर असल्याने कोणत्याही दोन जातींचा दर्जा हा समान नसतो. तो उतरंडीनुसार खालून वर पाहिले असता सन्मान वाढवणारा आणि वरून खाली पाहिले असता खालच्या जातींच्या संदर्भानी तिरस्कार निदर्शनास येतो.